टीआरपी घोटाळ्याप्रकरणी १२ आठवड्यांत तपास पूर्ण करु अशी ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे. दरम्यान यावेळी उच्च न्यायालयाने रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसंबंधी महत्वाचे आदेश दिले.
अर्णब गोस्वामी आणि एआरजी आऊटलीयर कंपनीसंबंधी अटकेची कारवाई करायची असल्यास तीन दिवस आधी नोटीस द्यावी असा आदेश न्यायालयाने बुधवारी सुनावणीदरम्यान दिला. प्रकरणाचा तपास कधीपर्यंत पूर्ण करणार हे बुधवारच्या सुनावणीत स्पष्ट करण्याचं न्यायालयाने पोलिसांना बजावलं होतं. राज्य सरकारकडून १२ आठवड्यात तपास पूर्ण केल जाईल अशी माहिती देण्यात आल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला.
टीआरपी घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान देण्यासह पोलिसांच्या कारवाईपासून संरक्षण द्यावे, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा या मागणीसाठी गोस्वामी आणि एआरजी आउटलियर मीडिया कंपनीने याचिका केली होती. या याचिकांवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सध्या नियमित सुनावणी सुरू आहे.
Comments
Loading…