मुंबई: मुंबईत कोरोनाचे ३५७ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील रुग्णांची संख्या ४ हजार ५८९ इतकी झाली आहे. २४ तासात ११ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत एकट्या मुंबईत करोनाची लागण झाल्याने १७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत ५९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आज ६ हजार ८१७ झाली आहे. दिवसभरात रुग्णांच्या संख्येत ३९४ नवे रुग्ण वाढले आहेत. तर राज्यात आज दिवसभरात १८ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यातील मृतांची संख्या आता ३०१ झाली आहे. १८ मृतांपैकी ११ मुंबईतील आहेत. पुण्यातील ५ तर दोन मालेगावमधील आहेत. तर आज ११७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने राज्यातील एकूण ९५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यातील एकूण १ लाख १९ हजार १६१ लोक होम क्वारंटाईन आहेत. तर ८ हजार ८१४ लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
धारावीत आज करोनाचे सहा नवीन रुग्ण आढळून आले. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. धारावीतील एकूण रुग्णांची संख्या आता २२० इतकी झाली आहे तर आतापर्यंत १४ जणांना प्राणांस मुकावे लागले आहे. आज जे रुग्ण आढळले आहेत ते ३६ ते ६० वर्षे वयोगटातील आहेत. गोपीनाथ कॉलनी, कल्याणवाडी, जनता नगर, बनवारी कंपाऊंड गल्ली, मौलाना आझाद नगर या भागातील हे रुग्ण आहेत, असे पालिकेने नमूद केले.
देशात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण मुंबईत आढळले आहेत. सध्या कोरोनासाठी धारावी हा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे. दाट लोकवस्तीमुळे येथे उपाययोजना करण्यात पालिकेला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीतही आरोग्य कर्मचारी या भागातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी झटत आहेत.
Comments
0 comments