मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा एकदा आरोग्य विभागाला चिंता सतावत आहे. “महापालिका मुंबईतील करोना स्थितीचा आढावा घेणार आहे. जर करोना रुग्ण वाढत राहिले आणि लोकांनी करोनासंबंधीत नियमांचं उल्लंघन केलं तर महापालिका पुढील १० दिवसांत कठोर निर्णय घेताना अजिबात मागे पुढे पाहणार नाही,” असा इशारा पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
मुंबईत दरदिवशी नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात ४०० होती. फेब्रुवारीपासून यात पुन्हा वाढ झाल्याचे आकडेवारीत दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही संख्या पुन्हा पाचशेपर्यंत पोहोचली आहे. गेल्या आठवडय़ापेक्षा या आठवडय़ात निश्चितच रुग्णांची संख्या चारशे ते पाचशेने वाढली आहे.
परदेशातून आणि इतर जिल्ह्य़ांतून येणाऱ्या प्रवाशांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढली आहे. नियमित विभागवार केलेल्या चाचण्या बंद झाल्या आहेत. आत्ता झोपडपट्टीतील रुग्णसंख्या कमीच असून आता आढळलेले रुग्ण हे गृहनिर्माण संकुलातील आहेत. त्यातही अधिक रुग्णांचे निदान हे विमानतळ, रेल्वे स्थानके आणि पालिकेच्या रुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभागांमध्ये केलं जातं. त्यात प्रतिबंधात्मक नियमांचे पालनही योग्य रीतीने केलं जात नसल्याचं,” सुरेश काकाणी यांनी याआधी सांगितलं होतं.
Comments
Loading…